जपतलाई आश्रमशाळेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत दुर्दैवी सर्पदंशाच्या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीमुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना काहीसा आधार मिळणार आहे.
या प्रकरणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे OSD अनिरुद्ध पालकर यांच्याकडे केली होती.
माजी आमदार डॉ. होळी यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. या निर्णयाबद्दल डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD अनिरुद्ध पालकर यांचे आभार मानले.
“जपतलाई येथील दुर्दैवी घटनेमुळे आदिवासी समाजावर मोठे दुःख कोसळले आहे. शासनाने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करून संवेदनशीलता दाखविली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD अनिरुद्ध पालकर यांचे मनःपूर्वक आभार. मात्र, आर्थिक मदतीसोबतच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी म्हटले.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन व्यवस्था आणि सुरक्षा मानकांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. होळी यांनी केली आहे.




