ग्रामीण वार्ता उत्कृष्ट लेखनासाठी पत्रकार दुर्योधन घोंगडे यांचा सन्मान
माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव
मुल प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील विविध सामाजिक प्रश्न, जनसामान्यांच्या समस्या आणि ग्रामीण भागातील वस्तुस्थिती प्रभावीपणे आपल्या लेखणीतून मांडत पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करणारे पत्रकार दुर्योधन विलास घोंगडे यांचा ‘ग्रामीण वार्ता – उत्कृष्ट लेखन’ या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मेळाव्यात गौरव करण्यात आला.
चंद्रपूर येथे आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पत्रकार दुर्योधन घोंगडे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, सामाजिक प्रश्न, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शेती तसेच प्रशासनाशी संबंधित विविध विषयांना सातत्याने आपल्या लेखणीतून वाचा फोडण्याच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
ग्रामीण पत्रकारिता ही केवळ बातमी प्रसिद्ध करण्यापुरती मर्यादित नसून, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागातील वास्तव परिस्थिती निर्भीडपणे मांडत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार घोंगडे सातत्याने कार्यरत आहेत.
हा सन्मान आपल्या लेखणीवर विश्वास ठेवणाऱ्या ग्रामीण भागातील जनता, वाचक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील सहकाऱ्यांना समर्पित असल्याची भावना पत्रकार दुर्योधन विलास घोंगडे यांनी व्यक्त केली. यापुढेही सत्य, जनहित आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत पत्रकारिता करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पत्रकार दुर्योधन घोंगडे यांच्या या सन्मानाबद्दल पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.




