मूल शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपाचा नगर परिषद कार्यालयावर घागर मोर्चा
✍️देव पिंपळे मूल मुल प्रतिनिधी ✍️, मूल नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज नगर परिषद कार्यालयावर घागर मोर्चा काढून मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पिण्याचे पाणी, घरगुती वापराचे पाणी तसेच दैनंदिन जीवनावश्यक गरजांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे.
भाजपाच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली की, मूल शहरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा, सर्व प्रभागांमध्ये नियमित वेळापत्रकानुसार पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची कारणे नागरिकांसमोर स्पष्ट करण्यात यावीत तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. ज्या भागात पाणीटंचाई तीव्र आहे, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात आला नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
या घागर मोर्चात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.




