Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedभामरागड तालुक्यात स्वामित्व योजनेला वेग; १० गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण

भामरागड तालुक्यात स्वामित्व योजनेला वेग; १० गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण

मालकी हक्काच्या सनद वाटपाचा मार्ग मोकळा

गडचिरोली प्रतिनिधी : भामरागड तालुक्यात स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यात आली असून दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी मौजा कथलासूर, भटपर, हितलवारा, जुव्वी, दर्भा, मलेंगा, मर्दहूर, विसामुंडी, टेकला व गुंडुरवाही या दहा गावांचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.

भामरागड तालुक्यात नक्षल प्रभाव कमी झाल्याने निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणाचा लाभ घेत जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्री. विजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित असलेल्या गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षणाची कामे भामरागड भूमी अभिलेख विभागाने पोलीस विभागाच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.

तसेच मौजा बिनागुंडा, दामनमर्का व कुव्वाकोडी या गावांमध्ये पोलीस सुरक्षा परवानगी प्राप्त झाल्यानंतर ड्रोन सर्वेक्षणाची कार्यवाही करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तजवीज ठेवण्यात आली असल्याची माहिती भूमी अभिलेखचे उप अधीक्षक श्री विठ्ठल जाधव यांनी दिली

स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या सीमांचे अचूक निर्धारण होऊन मालकी हक्काची अधिकृत सनद मिळत आहे. विशेषतः नक्षल प्रभावित भामरागड तालुक्यातील काही गावे प्रलंबित होती. मात्र, सद्यस्थितीत तेथील सर्वेक्षण पूर्ण झाल्याने या गावांतील नागरिकांनाही लवकरच मालकी हक्काची सनद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्वामित्व योजनेमुळे मालमत्तेच्या कायदेशीर मालकीची खात्री मिळते तसेच कर्जप्राप्तीची प्रक्रिया सुलभ होते. ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गावठाणातील मिळकतींचे अचूक मोजमाप, नकाशे व मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले असून यामुळे भविष्यातील वाद टाळण्यास मोठी मदत होणार आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जमीनसंबंधित वादांचे त्वरित निराकरण होण्यास मदत होणार असून मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ होणार आहे.

अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक सर्वेक्षण पूर्ण करून स्वामित्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, भामरागडसारख्या दुर्गम व पूर्वी नक्षल प्रभावित भागातही विकास कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत.

🖋️सतिश राजुरवार संपादक 🖋️

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments