
चामौशिॅ प्रतिनिधी:-
शासकीय खुर्चीवर बसून केवळ कर्तव्य बजावणे ही एक बाजू, पण समाजातील वंचितांसाठी आपलेपणाने धावून जाणे ही खरी सेवा आहे. याचाच प्रत्यय चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर येथे आला. येथील ग्रामपंचायत अधिकारी मंगेशकुमार वाळके यांनी आपला वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत एका कुपोषित बालकाला दत्तक घेण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
आजकाल वाढदिवसावर हजारो रुपये खर्च करून शक्तिप्रदर्शन करण्याची जणू फॅशनच झाली आहे. मात्र, मंगेशकुमार वाळके यांनी या परंपरेला फाटा दिला. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव न करता, गावातील एका अतितीव्र कुपोषित बालकासोबत (रतीम सुरांजन रॉय) हा दिवस साजरा केला.
सामाजिक बांधिलकीचा वारसा
वाळके हे केवळ प्रशासकीय कामातच चोख नाहीत, तर ते अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक-शैक्षणिक चळवळीतही नेहमी सक्रिय असतात. याच सामाजिक बांधिलकीतून त्यांनी रतीम या बालकाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारून त्याला दत्तक घेतले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बालकाच्या आरोग्याला आणि भविष्याला नवी दिशा मिळणार आहे.
एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याने समाजासमोर ठेवलेला हा आदर्श पाहून गौरीपूर आणि परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांचे मनापासून अभिनंदन केले जात आहे. “असे संवेदनशील अधिकारी लाभल्यास समाजातील अनेक प्रश्न सहज सुटू शकतात,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वाढदिवस साजरा करताना ग्रामपंचायत गौरीपूरचे प्रशासक हृदय बाला, जिल्हा परिषद शाळेचे मुख्यधापक नगराळे, अंगणवाडी सेविका अरुणा रॉय, स्नेहलता बिश्वास, दीपाली मिस्त्री, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक मंडल, असीम अधिकारी, पौर्णिमा माझी, संगणक परिचालक संतोष बुरांडे उपस्थित होते.
ग्रामपंचायत अधिकारी यांची सेवाभावी वृत्ती बघता ग्रामस्थां कडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.




